Monday, April 25, 2011

विद्युत निर्मितीसाठी पाणी

विद्युत निर्मितीसाठी पाणी
फक्त सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा सोडली तर कोळसा, तेल, गॅस किंवा कोणताही बायो-मास (उदा. उसाचा चोथा) जाळून वीज निर्माण करावयाची तर पाणी लागते. अणु-ऊर्जेसाठीहि लागते. ते कशासाठी हे सामान्य माणसाला पुरेसे माहीत नसते.
इंधन जाळून जी उष्ण्ता निर्माण होते ती उष्ण गॅसच्या स्वरूपात असते. तो वायु बॉयलर मधून गेला कीं त्यातिल ऊष्ण्ता बॉयलर ट्यूब्समधील पाण्याला मिळून त्याची वाफ होते व ती वाफहि आणखी खूप तापवली जाते. बॉयलर मधून बाहेर येणारी उच्च दाबाची व अति ऊष्ण वाफ Steam Turbine फिरवते व त्याला जोडलेले जनित्र फिरून वीज निर्माण होते. मग त्या वाफेचे पुढे काय होते? आणि त्या अजूनहि काहीशा गरम गॅसचे पण काय होते?
गॅसचे तपमान व दाब खूप खालीं आलेले असतात पण तरीहि त्यात पुष्कळ उष्णता बाकी असते. तो गॅस Economizer and Pre-heater नावाच्या यंत्रणेतून जातो व जास्तीत जास्त उष्णता काढून घेतली जाते. नंतर तो गॅस चिमणीमधून वर हवेत सोडून देतात मात्र त्यापूर्वी त्यातील राखेचे सूक्ष्म कण शक्य तेवढे वेगळे केले जातात. या यंत्रणेमध्ये दिवसेदिवस सुधारणा होत आहेत.
वाफेचे काय होते? ती पण थंड करून तिचे पाण्यात रूपांतर करून ते पाणी साचवून पुन्हा बॉयलरमध्ये पाठवले जाते. असे कां बुवा? हे पाणी सोडून कां देत नाहीत? परवडत नाही! बॉयलरमध्ये साधे पाणी वापरले तर थोड्याच दिवसात त्यातील विरघळलेले क्षार वा इतर संयुगे बॉयलरच्या ट्यूबांत साचून त्या फुटतात. त्यामुळे कोणत्याही बॉयलरमध्ये Demineralised Waterच वापरावे लागते. साध्या पाण्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करून ते मिळवावे लागते व अर्थातच खूप महाग असते त्यामुळे तेच पुन्हा पुन्हा वापरणे भाग पडते.
Turbine मधून बाहेर आलेल्या वाफेचे पाण्यात रूपांतर करण्यासाठी ’ट्यूब्जमधून वाफ व बाहेरून पाणी खेळवलेले’ अशी यंत्रणा असते. वाफ थंड होते व तिचे पाणी होते. पण बाहेरचे पाणी गरम होते! त्याचे काय करायचे?
जर हे खेळवलेले पाणी समुद्रातून उचललेले असले (उदा. डहाणू किंवा जैतापूर - होईल तेव्हा आणि झाले तर) तर ते सरळ समुद्रात सोडले जाते. समुद्राच्या पाण्यापेक्षा ते किंचितसेच गरम असते (५-६ डिग्री) आणि समुद्रात मिसळून थंड होते.
मात्र जेव्हा विद्युतनिर्मिति केंद्र समुद्राजवळ नसेल तेव्हां काय? तेथे मात्र नदी किंवा धरणातून पाणी उचलावे लागते. समुद्राचे पाणी समुद्रात सोडतात पण नदीचे पाणी मात्र नदीत न सोडता थंड करून पुन्हापुन्हा वापरले जाते. यासाठी Cooling Towers नावाची यंत्रणा वापरली जाते. या टॉवर्स मध्ये गरम पाणी उंचावर नेऊन खाली सोडले जाते ते खाली घरंगळत येताना हवेशी संबंध येऊन खाली पोंचेपर्यंत थंड होते व मग पुन्हा वाफेला थंड करण्याच्या कामाला जाते.
मात्र या प्रवासात कोठेकोठे थोडे पाणी वाफेच्या रूपाने उडून जाते. Power Stations मध्ये जे उंच Cooling Towers असतात त्यातून वर जाणारी ही वाफ दिसते (तो धूर नसतो!) अशा ’हरवलेल्या’ पाण्याची रोजच्या रोज थोडीथोडी भरपाई करावी लागते. Power साठी पाणी लागते ते हे आणि Power Station (सरकारी वा खासगी) हवे तर हे पाणीहि लागणारच त्याला इलाज नाही. गेल्य वर्षी पाणी संपल्यामुळे चंद्रपुर येथील जनित्रे बंद ठेवावी लागली होती हे आठवत असेल.
’जैतापुर’ नको पण जैतापुरसाठी गोडे पाणी लागणार नाही हेहि विचारात घेतले पाहिजे.
अर्थात काहीच नको असेल तर मग आनंदच आहे.

3 comments:

  1. धन्यवाद !!!!!
    अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली पुनःश्चः आभार !
    उपाध्ये गुरुजी, जेजुरी.
    www.jejuri.in

    ReplyDelete
  2. Prabhakarji......dhanyavad.

    hyaach vishyavar majha lekh pan veglya padhtine vij urjaa nirmiti var aahe. aapan vacha v aapli pratikriya kalvaa.

    Dewan-Ghewan-- http://mnbasarkar.blogspot.com

    mnbasarkar.

    ReplyDelete
  3. श्री. गुरुजी,
    धन्यवाद. आपली जेजुरीबद्दलची वेब्साइट पाहिली. छान आहे. अभिनंदन

    ReplyDelete