Saturday, September 24, 2011

मन्सूर अली खान पतौडी

मन्सूर अली खान पतौडी
आजकालच्या मराठी पत्रकारितेचा नमुना पतौडीच्या मृत्युलेखांमुळे नजरेसमोर आला. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख भोपाळचा नबाब असा केला गेलेला दिसला. त्याच्या क्रिकेटमधील असामान्य कामगिरीबद्दल खूप लिहिले गेले ते सर्व योग्यच आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल आदराने व प्रेमाने लिहिले आहे. पण ’भोपाळचा नबाब?’
तो कधीच भोपाळचा नबाब नव्हता! त्याचे वडील इफ्तिकार अली हे हरयाणातील ’पतौडी’ नावाच्या लहानशा संस्थानाचे नबाब होते. त्यांच्या मृत्यूनंतर मन्सूर अली हे अखेरचे नबाब झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थान भारतात विलीन झाले व नबाबी सम्पली मात्र पद काही काळ चालू राहिले. मग इंदिरा गांधी यानी संस्थानिकांचे सर्व हक्क व पदव्या सम्पवल्यावर तेहि गेले.
मन्सूर अली खान यांची आई भोपाळच्या अखेरच्या नबाबांची मुलगी. संस्थान गेले तरी वडिलांच्या पश्चात नबाबपद तिच्याकडे आले. मात्र सर्व संस्थानिकांची पदे गेल्यावर भोपाळचे नबाबपद मन्सूर अली खान यांचेकडे कधीच आले नाही. तेव्हा ते ’पतौडीचे अखेरचे नबाब’ एवढेच खरे. भारतीय क्रिकेट्चे नबाब हेहि खरे! तो त्यांचा किताब कायम राहील.

Tuesday, September 20, 2011

गृहकर्जाची कागदपत्रे.

गृहकर्जाची कागदपत्रे.
महानगरपालिकेच्या कर्मचार्या!नी गृहकर्ज घेतले असेल तर ते फिटेपर्यंत घरावरील हक्क दर्शवणारी कागदपत्रे कार्यालयात ठेवावी लागतात. कर्ज पूर्ण फिटल्यावर तीं त्याना बिनतक्रार परत मिळावयास हवीत हे उघड आहे. मात्र निवृत्त होताना सर्व कर्ज फिटले तरीहि तीं वेळेवर मिळत नाहीत. अनेक हेलपाटे घालावे लागतात अशी तक्रार वर्तमानपत्रात आली. असेहि लिहिले गेले कीं संमतिपत्रावर सक्षम अधिकारी दीर्घकाळ सह्याच करत नाहीत म्हणून असे होते. तक्रार छापून आल्यावर सक्षम अधिकार्या ने खुलासा केला कीं माझ्याकडे दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मग ज्याची तक्रार होती त्याच्या केसमध्येहि त्यानी दोन वर्षांपुर्वीच सही केली असे आढळले. तरीहि कागद कां परत केले नव्हते याची आता चौकशी करूं असेहि म्हटले गेले.

कारण काय हे लहान मूलहि सहज जाणू शकेल! पैसा घेतल्याशिवाय काहीहि होत नाही हा आपल्या सर्वांचा आता रोजचा अनुभव झाला आहे. पूर्वी अवैध कामासाठी पैसा मोजावा लागे आता वैध वा हक्काचे कामहि कमीजास्त पैसा मोजल्याशिवाय करायचेच नाही अशी, सरकारी, म्युनिसिपल वगैरे नोकरानी जणू शपथच वाहिलेली आहे. मग तो जन्माचा दाखला असो वा मृत्यूचा! सात-बारा वा सिटी सर्व्हे बद्दल तर बोलायची सोयच नाही. बॅंकेच्या खात्यातून पैसे काढावयास गेले तर टक्केवारी मागत नाहीत हे नशीब! आणखी पांच वर्षांनी कदाचित मागतील! मग बिनसरकारी Banks आमच्याकडे असें काही नाहीं अशी अभिमानाने जाहिरात करतील!

Tuesday, September 6, 2011

केजरीवाल आणि प्राप्तिकर

आजच्या टाईम्स मध्ये एक आश्चर्यकारक बातमी वाचली. श्री. अरविंद केजरीवाल यांना प्राप्तीकर खात्याने ९.४ लक्ष रुपयांची नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर हा केजरीवाल यांचा वैयक्तिक मामला आहे. कर देय असेल तर दिला पाहिजे. मागणी अन्यायाची असेल तर त्याविरुद्ध योग्य ती कारवाई ते करुं शकतात. जनतेचा त्याच्याशी उघडच काडीचाही संबंध नाहीं. ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी स्टडी लिव्ह घेतली होती. नंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला पण तो स्वीकारलेला नाहीं. हे सर्व त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत. त्यांचेशीही जनतेचा, तुमचा आमचा काहीही संबंध नाहीं.
बातमी अशी कीं India Against Corruption नावाची (त्यांच्याच पुढाकाराने चालणारी?) एक संस्था वा चळवळ आतां शाळा, कॉलेजे, देवळे, गणपती-उत्सव मंडप, अशा अनेक ठिकाणी जनतेकडून केजरीवाल याना मदत (कर भरण्यासाठी!) म्हणून पैसे गोळा करणार आहे! श्री. केजरीवाल याना हे ठाऊक आहे काय आणि असल्यास त्याना हे पसंत आहे काय याबद्दल बातमीत काही खुलासा नाहीं. कारण असें दिले आहे कीं श्री केजरीवाल यांनी जनतेची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली आहे! तेव्हा जनतेने त्याना मदत केली पाहिजे.
हे सर्व काय चालले आहे? हे श्री. अण्णा हजारे यांना पसंत आहे काय? मला शंका आहे. असें प्रकार सर्रास चालू झाले तर लोकपाल चळवळ बदनाम होईल आणि बदनामी श्री. अण्णा हजारेनाही येऊन चिकटेल. ‘देवा श्री. अण्णा हजारेना त्यांच्या मित्रांपासून वाचव’ असें म्हणण्याची वेळ आली आहे.