Wednesday, July 31, 2013

दाभोळचा गॅस

दाभोळच्या गॅस जेटीबद्दल पूर्वी लिहिले होते. त्या जेटीवर गॅसची जहाजे आता लवकरच लागूं लागतील. दाभोळपासून बंगलोरपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम चालू आहे. ही पाइपलाइन अर्थातच महाराष्ट्राच्या तीनचार जिल्ह्यांतून जाईल मात्र वाटेतल्या कोणत्याहि शहराला त्यातून गॅस मिळण्याची सोय असणार नाही. कर्नाटकात मात्र त्या लाइनवरील इतर छोट्यामोठ्या शहरांना गॅस मिळणार आहे. एक पॉवरस्टेशनहि गॅसवर चालणार आहे. एकूण सर्व गॅस कर्नाटकात जाणार आहे. कोची येथे अशीच एक गॅसजेटी बनते आहे. तेथे येणारा गॅसहि केरळ व कर्नाटकातच वापरला जाणार आहे. आंध्रच्या किनार्‍यावरील एका छोट्या बंदरातहि लिक्विडगॅस आयातीची मोठी सोय बनते आहे. त्या गॅससाठी आंध्र, तामिळनाडु, कर्नाटक वाटणी मागत आहेत. कुडनकुलम येथील पॉवरस्टेशन सर्व मतलबी विरोधाला न जुमानता अखेर सुरू झाले. त्यासाठी जयललिताने सहकार्य केले, त्याची किंमत म्हणून तेथे निर्माण होणार्‍या पॉवरचा मोठा वाटा तामिळनाडुला मिळणार आहे व उरलेल्या साठी आंध्र-कर्नाटकानी मोर्चेबांधणी चालवली आहे. या सार्‍यात महाराष्ट्र कोठे आहे? आम्हाला काही नकोच आहे! दाभोळची वीज महाग म्हणून नको. गॅसहि नको (वाटा मागितल्याचे वाचनात नाही). एन्रॉन समुद्रात बुडवण्याचे काय झाले? पर्यावरणाचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही. गुहागर परिसराचे काही नुकसान झाल्याचेहि ऐकिवात नाही. गॅस आयातीची सोय उद्या वाढेलहि पण आम्हा महाराष्ट्रियाना काय त्याचे? गॅस जमिनीखालून कर्नाटकात गेला तर गेला! गोव्यालाहि पाहिजे तर द्या! आम्हाला नकोच. जैतापुर? नको नको. ७०% वीज महाराष्ट्राला देणार असाल तर जैतापुर चालेल असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही. महाराष्ट्र गाढ झोपला आहे. क्षुद्र कुरघोडीचे राजकारण व भ्रष्टाचार सर्वाना हवा आहे. जनता अमर आहे.

Saturday, July 13, 2013

‘झोका’च्या निमित्ताने

उंच माझा झोका ही रमाबाई रानडे यांच्या चरित्रावर आधारलेली मालिका आता संपण्याच्या बेतात आहे. त्यानी स्वत; लिहिलेल्या ‘आठवणीं’चा आधार घेऊन पूर्वार्ध घडला. तो बराचसा त्या पुस्तकाला धरून होता असे पुस्तक वाचलेल्या माझ्यासारख्याना वाटले. अर्थात काही बाबतीत थोडे स्वातंत्र्य घेणे आवश्यक होते व ते प्रमाणातच घेतले जात होते. मात्र न्यायमूर्ति रानड्यांच्या मृत्यूनंतरचा कथाभाग लिखित हकीगतींवर किती आधारलेला आहे याबद्दल संशय वाटतो. रानड्यांचे भाऊ व घरातील इतर व्यक्ति या प्रत्यक्ष होऊन गेलेल्या असल्यामुळे त्यांचे चित्रण सत्याला धरूनच व्हायला हवे. त्यात फेरफार केल्यास ते त्या व्यक्तींवर अन्याय करणारे व त्यांचे वारस असणार्‍याना मनस्ताप देणारे ठरू शकते. विषेशतः नीळकंठ ऊर्फ ‘आबा’ किंवा ‘नानू’ यांच्या उभ्या केलेल्या व्यक्तिमत्वांना लिखित सत्याचा आधार कितपत आहे असा प्रष्न पडतो. याबाबत निर्मात्यानी काही खुलासा करणे आवश्यक वाटते. मालिकांचा उद्देश ‘करमणूक’ असा असला तरी विकृत चित्रण करण्याचा निर्मात्यांना अधिकार नाही. रमाबाई रानड्यांच्या कार्यामध्ये काशीबाई कानिटकरांचा मोठा सहभाग दाखवला आहे. त्या लेखिका खर्‍या पण त्यांच्या या प्रमुख सहभागाबद्दलचा उल्लेख त्यांच्याबद्दल वाचावयास मिळणार्‍या माहितीत मला आढळला नाही. मात्र तो नसेल असे मला म्हणावयाचे नाही.