Monday, October 10, 2011

श्रावण

श्रावण केव्हाच संपला, आश्विन चालू आहे पण आज अचानक मला श्रावणावर लिहायचे आहे. तोच श्रावण पण मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये वर्णनात फरक दिसतो.
मराठी कवि म्हणतात –
श्रावणात घन निळा बरसला – रिमझिम रेशिमधारा
किंवा,
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे॥

किंवा
श्रावणाच्या शिरव्यानी आनंदली धराराणी ...

याउलट हिंदी मध्ये –
बरसत गरजत सावन आयो री.....
किंवा
सावन घन गर्जे ...
किंवा –
सावनकी बूंदनिया, बरसत घनघोर
किंवा –
झुकि आयी बदरिया सावनकी ..

(या सार्‍या बंदिशि आहेत, हिंदी काव्याशी माझा परिचय नाही)

दोन्ही वर्णनात असा मोठा फरक कां असेल बरे, असा मला प्रश्न पडला. मग मलाच त्याचे उत्तर सुचले ते असे.
उत्तरेत श्रावण सुरू होतो तोवर आपला आषाढ अर्धा झालेला असतो. येथे तोवर पाऊस केव्हाच सुरू झालेला असतो. पहिला जोर थोडा कमी झालेला असतो. येथे श्रावण सुरू होईतों तो आणखीनच कमी झालेला असतो म्हणून रेशिमधारा किंवा रिमझिम
पण उत्तरेत पाऊस इथल्यापेक्षा साधारण २-३ आठवडे उशीरा सुरू होतो. त्यामुळे त्यांचा श्रावण सुरू होण्याच्या वेळेला पावसाची सुरवातच असते! त्यामुळे, बरसत घन घोर, बरसत गरजत सावन आयो ही वर्णने युक्तच आहेत.

Thursday, October 6, 2011

दसरा आणि रावण दहन

दरवर्षीप्रमाणे या वर्षीहि दसरा आला आणि दिल्लीमध्ये आणि इतरत्रहि रावणाच्या प्रतिमांचे समारंभपूर्वक दहन झाले. हे वर्षानुवर्षे चालले आहे पण दसरा आणि रावणवध यांचा काही संबंध आहे काय? मुळीच नाही!
राम वनवासाला गेला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता. रावणवधानंतर राम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आला तेव्हांहि ग्रीष्म ऋतुच चालू होता. रावणाचा वध चैत्र महिन्यात झाला होता हे वाल्मिकि रामायण (मराठी भाषांतर) वाचल्यावर सहजच स्पष्टपणे दिसून येते. रावणवध व सीताशुद्धि नंतर दशरथ प्रगट झाला व त्याने रामाला ’तुझी वनवासाची चौदा वर्षे पुरी झाली आहेत व रावणहि मारला गेला आहे तेव्हां तूं आता अयोध्येला परत जा’ असा आदेश दिला असे रामायणातच लिहिले आहे. तिकडे भरतहि चौदा वर्षे पुरी होऊन वचन दिल्याप्रमाणे आता राम येईल अशी वाट बघत होता. त्याप्रमाणे राम परत आलाच. वनवास ग्रीष्मात सुरू झाला तर चौदा वर्षे पुरी होतानाहि ग्रीष्मच होता. मग रामाने विजयादशमीला रावणवध कसा केलेला असेल? शक्यच नाही.
रावणाने सीतेला नेले तेव्हा शिशिर ऋतू चालू होता. ते वर्ष वालीवध सुग्रीव मैत्री यात गेले. मग सर्व पावसाळा रामाने किंश्किंधे जवळच्या गुहेत व सीतेने लंकेत काढला. पावसाळ्या नंतर हनुमानाने सीतेला शोधले, मग पुढच्या पावसाळ्या पूर्वीच सेतू बांधून वानरसैन्य व राम-लक्ष्मण लंकेत पोचले. दोनेक महिने युद्ध चालून पावसाळ्यापूर्वी रावणवध झाला. पावसाळाभर युद्ध चालून मग विजयादशमीला रावणवध झालेला नाहीं. सीतेला दुसरा पावसाळा लंकेत काढावा लागलेला नाहीं!
रामायणातील हे सर्व काल-उल्लेख असे स्पष्ट दर्शवतात कीं चौदाव्या वर्षाच्या अखेरीला पावसाळ्यापूर्वी रावणवध झाला. तेव्हा रावणवध व विजयादशमी यांचा काहीहि संबंध नाही.
तरीहि बिचारा रावण दरवर्षी विजयादशमीला समारंभपूर्वक व मंत्री-पुढारी-परदेशी पाहुणे यांच्या उपस्थितीत मरतो आहे वा जाळला जातो आहे!
उत्तर भारतातील या प्रथेचे मूळ कशात आहे, कोणी खुलासा करील काय? दक्षिण भारतात अशी प्रथा नाहीं हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

Saturday, October 1, 2011

मुंबईच्या रस्त्यांचीं कंत्राटे.

५५० कोटींच्या कॉंट्रॅक्ट्सचा विषय गेले काही दिवस गाजत होता. आता ही कॉंट्रॅक्ट्स मंजूर झाली. वृत्तपत्रानी याबद्दलच्या बातम्या छापताना एकमेकांवर पुढार्यां नी केलेली चिखलफेक, शिवराळपणा वार-पलटवार याचाच रतीब घातला. एकाहि ठिकाणी खुलासेवार माहिती दिली गेली नाही.
१. कॉंट्रॅक्ट्स रस्ते नवीन बांधण्याचीं कीं दुरुस्तीचीं?
२. रस्ते कॉंक्रीटचे कीं डांबराचे?
३. कोणत्या प्रकारचे किती लांबीचे?
४. कोणत्या कॉंट्रॅक्टरला कोणत्या रस्त्याचे काम देणार? त्याबद्दल काय तक्रारी आहेत?
५. कमीतकमी किमतीपेक्षा कोणती कॉंट्रॅक्टस जादा किमतीला दिली जात आहेत?
६. जुन्या रस्त्यांचे Complete Re-surfacing चे काम यात अंतर्भूत आहे काय?
७. या करारांमध्ये खड्डे-दुरुस्तीच्या कामांचा अंतर्भाव आहे का? किती प्रमाणावर?
या कोणत्याही विषयावर माहिती बाहेर आलेली नाही. माहिती मिळवण्यात व छापण्यात वृत्तपत्रांना रस नाहीं. त्याना फक्त भिकार राजकारणात रस आहे.
सर्वसाधारणपणे, कॉंक्रीटचे रस्ते बनवण्याबदल फारशा तक्रारी नाहीत. विलेपार्ले येथे मी राहतो, त्या भागात जेवढे कॉंक्रीटचे रस्ते झाले आहेत ते ठीक झाले आहेत असे दिसून येते.
आता रस्त्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी परकीय कंपन्याना बोलावण्याचे बेत चालले आहेत हे लांछनास्पद आहे. कॉर्पोरेशनचे अभियंते किंवा भारतीय कन्सलटंट कंपन्या हे कां करू शकत नाहीत? हे मान्य करणे अशक्य आहे. मुंबई कॉर्पोरेशन अनेक दशके मुंबईत रस्ते बनवत आहे त्यात नवीन असें काय आहे? भ्रष्टाचारही नवीन थोडाच आहे? मात्र प्रमाण प्रचंड वाढले आहे व त्याची लाज बिलकुल उरलेली नाहीं.