Wednesday, March 23, 2011

आरामनगर

आजच्या पेपरमध्ये म्हाडाच्या आरामनगर वसाहतीच्या पुनर्निर्माणाची बातमी वाचली आणि नवल वाटले. ही म्हणे म्हाडाची एक वसाहत आहे. त्यात ३७५ किंवा त्या जवळपास ’भाडेकरू’ आहेत. किती जुनी आहे माहीत नाही. मात्र बातमीतील उल्लेखावरून दिसते कीं कितीहि वर्षे झाली असली तरी ते ’भाडेकरू’च आहेत. त्यांचा मालकी हक्क दिसत नाही. वसाहत उघडच सरकारी मालकीच्या जमिनीवर बांधलेली असली पाहिजे. आता तिची पुनर्बांधणी व्हायची आहे. ते काम कुणा तरी बिल्डरला दिले जाणार आहे. अशा प्रकल्पाना भरघोस वाढीव FSI मिळतो. जमिनीची किंमत सरकारला किती मिळते माहीत नाही. मात्र भाडेकरू रहिवाशाना ५०० चौ.फुटाचे जागीं १२५० चौ.फुटांचे फ्लॅट मिळायचे आहेत (बहुधा फुकट!) असे बातमीत म्हटले आहे. मला कळत नाहीं कीं या ’भाडेकरूं’नी असे कोणते महान पुण्यकर्म केले आहे कीं त्याना १२५० चौ.फुटांचा फ्लॅट फुकट मिळावा? सरकारी जमीन ही जनतेच्या मालकीची आहे. ती बिल्डरला, बहुधा, अल्प किमतीत देऊन टाकणार व त्यावर भरघोस FSIची खैरात करणार. बिल्डरचे उखळ पांढरे होणार आणि ’भाडेकरू’ना १२५० चौ.फुटांचा फ्लॅट फुकट मिळणार. या सगळ्यामागले तत्वज्ञान मला आकलन होत नाही. दीर्घकाल ’भाडेकरू’ राहिलेल्यांना म्हाडाने नवीन घरे बांधून भाड्याने वा थोड्याफार सवलतीने विकत द्यावीं हे न्यायाचे होईल. पण त्यांना १२५० चौ.फुटाचे घर फुकट मिळावे ? कां? कळस म्हणजे त्याच बातमीत पुढे असेहि म्हटले होते कीं दुसरा एक बिल्डर त्याना २००० चौ. फुटाचीं घरे फुकटात देण्यास तयार झाला आहे!
खुलासा : आरामनगरमध्ये माझा कोणीहि परिचित, मित्र वा शत्रु, राहत नाही. तेव्हा या लेखनाला वा मतांना कोणताहि वैयक्तिक संबंध नाही.

No comments:

Post a Comment