Tuesday, February 1, 2011

सौर ऊर्जा

आजकाल सौर ऊर्जेचा बराच बोलबाला ऐकू येतो. पूर्वीच्या मानाने आता सौर ऊर्जेसाठी लागणारी पॅनेल्स काही प्रमाणात स्वस्त झाली आहेत. त्यामुळे दुर्गम भाग, जेथे वीज पोचलेलीच नाही अशा ठिकाणी सौर दिवे उपयुक्त ठरताहेत. काही समाजकार्य संस्था हे कार्य करत आहेत असे वाचनात आले. ज्याना या विजेचा फायदा मिळणार आहे त्यांचा थोडातरी सहभाग खर्चामध्ये असतो ही अतिशय योग्य कल्पना आहे. आपले पैसेहि यात गुंतवलेले आहेत ही भावना त्या व्यक्ति वा गावाला योग्य वापर व देखभाल करण्यास निश्चितच उद्युक्त करील. फुकट मिळालेल्याची किंमत वाटत नाही! अशा संस्थांच्या उपक्रमाना जनतेने व सरकारनेहि आर्थिक पाठिंबा द्यावयास हवा.
सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रकल्पांबद्दलहि वाचावयास मिळते. त्यासाठीहि ’जागा’ लागतेच त्यामुळे अशा प्रकल्पानाहि विरोध होईल! उर्जा फुकट असली तरी भांडवली खर्च व उर्जा साठवण या अडचणी आहेतच. असे प्रकल्प मोठ्या विद्युतकेंद्रांजवळच उभे राहिले तर दिवसा मिळणार्‍या उर्जेचा वापर सोपा होईल. छोट्याशा कड्याजवळ असे उर्जा केंद्र उभे राहिले आणि Pumped Storage ची व्यवस्था केल्यास, दिवसा मिळणार्‍या उर्जेचा वापर पाणी कड्यावर चढवण्यासाठी करून त्याच पाण्याचा उपयोग करून विजेची ’मागणी’ जास्त असलेल्या वेळी वीजनिर्मिति करतां येईल. सौर उर्जा ’साठवण्या’च्या प्रश्नाला हे उत्तर होऊ शकते. उंचावर चढवलेल्या पाण्याच्या रूपात ऊर्जा साठवली जाईल.
मोठ्या शहरांमध्ये मोठाले गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत त्यांना सौर उर्जा उत्पादन व्यवस्था करणे सक्तीचे करतां येईल. ती उर्जा त्यांना स्वत:च्या वापरासाठी, उदा. आवारातील दिवे, लिफ्ट्स वगैरेसाठी होऊ शकेल. यासाठी काही प्रमाणात सक्तीबरोबर अनुदानहि देता येईल. नवीन इमारतीना हल्ली सर्रास काचेच्या भिंती बाहेरच्या बाजूस असतात. काचेऐवजी काही भागात सौर उर्जा पॅनेल्स बसवली तर मिळणारी उर्जा इमारतीतील संगणकांसाठी वापरता येईल
मोठाले विमानतळ उभे राहत आहेत, जेथे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यांच्या पार्किंग लॉट्स मध्ये वा त्यांच्या विस्तीर्ण छपरांवर पडणारी सौर उर्जा फुकट जात आहे. तिचा उपयोग करण्याची सक्ति त्यांचेवर केली पाहिजे. विमानतळांच्या प्रचंड भांडवली खर्चात अशा प्रकल्पाचा खर्च सहज सामावून जाऊं शकेल. अशा अनेक कल्पना सुचवतां येतील. प्रष्न काही करण्याच्या इच्छाशक्तीचा आहे.

1 comment:

  1. हे प्रकल्प विखुरलेले असणेच शक्य आणि स्तुत्य असते. कारण मुळात सूर्यप्रकाश विखुरलेलाच लाभत असतो.

    शिवाय गरजेच्या ठिकाणीच हवी तेवढी वीज मिळत गेल्यास वीजनिर्मितीतील ऊर्जा व्यय आणि पारेषण वितरणातील अपव्यय दोन्हीही टाळता येतात.

    ReplyDelete