Thursday, January 22, 2015

मतलबाचा किनारी मार्ग.


गेले काही दिवस मुंबईत पश्चिम किनार्‍यावर नवीन रस्ता बांधण्याबद्दल बातम्या व लेख येत आहेत. या रस्त्याची कल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळेपासून चर्चेत आहे. वांद्रे-वरळी सेतु पुढे वाढवून हाजीअलीपर्यंत नेणे फार खर्चाचे होणार असल्याने त्याला पर्याय म्हणून किनारी मार्ग पुढे आला. त्यामुळे तेव्हा त्याची व्याप्ति वरळीपासून मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतच मर्यादित होती. मात्र आता त्याची व्याप्ति फार वाढली आहे. वरसोव्यापर्यंत किनार्‍यानजीक रस्ता करून मग एक लांबलचक बोगदा करून तो मारवे पर्यंत जाणार आहे. याचे मागे काय अर्थकारण आहे याचा विचार पडतो. वास्तविक मार्वे-मढ वगैरे भूभाग मुख्य भूमीपासून अलग पडलेला आहे. वरसोव्याहून लॉंच किंवा मालाडमधून निघणारा एक लांबलचक रस्ता येवढेच रहदारीचे मार्ग आहेत. या भूभागामध्ये या कारणामुळे फारशी वस्ती नाही. श्रीमंतांचे बंगले वगैरे आहेत. मग एवढा मोठा खर्च करून बोगदा बांधण्यामागे काय हेतु आहे? एकदा बोगदा झाला व या भागातून वरसोवा (मेट्रोची सोय) व तेथून थेट दक्षिण मुंबईपर्यंत जाण्याचा राजमार्ग उपलब्ध झाला कीं या भूभागाचे काय होईल हे उघड आहे. येथे प्रचंड प्रमाणावर मोठमोठ्या अनेकमजली इमारती उभ्या राहतील. त्यात अर्थातच राजेशाही 3BHK वा त्याहून मोठ्या आकाराचे फ्लॅट बनतील. बिल्डरांचे उखळ पांढरे होईल. हे सर्व जनतेच्या खर्चाने होणार. राजवट बदलली तरीहि बिल्डर व सत्ताधीश यांचे साटेलोटे अबाधितच राहणार आहे. जनता हतबल आहे.

No comments:

Post a Comment