Saturday, July 9, 2011

मुंबई-पुणे नवा बोगदा.

खोपोली पासून सिंहगड संस्थेपर्यंत नवा ८ किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्याच्या योजनेबद्दल आज बातमी आली आहे. काही दिवसापूर्वी अशीच बातमी आली होती तेव्हा बोगदा ’सिंहगडा’पर्यंत जाणार असे खुशाल म्हटले होते! म्हणजे सिंहगडापासून पुण्याला उलटे यायचे? बातम्या अशाच दिल्या जातात!
आजच्या बातमीतहि बोगदा खोपोलीपासून सुरू होणार असे म्हटले आहे त्यामुळे बरोबर कल्पना येणार नाही. एक्सप्रेस वे खोपोलीत न जाता वेगळ्या वाटेने डोंगरांच्या पायथ्यापर्यंत जातो व फूड-मॉल नंतर थोडे अंतर चढून गेल्यावर अचानक डावीकडे वळून एक छोटी खिंड ओलांडून जुन्या मुंबई-पुणे रस्त्याला मिळतो. या जुन्या रस्त्याचीच खूप सुधारणा व रुंदीकरण करून खंडाळ्यापर्यंत त्याचाच वापर करून एक्सप्रेसवे बनला. खंडाळ्यापासून लोणावळ्यापलिकडे पोचेपर्यंत जो नवा बाह्यवळण रस्ता एक्सप्रेसवे चा भाग झाला आहे तोहि NH - 4 च्याच सुधारणेचा एक भाग म्हणून आधीच सुरू झाला होता.
एक्सप्रेसवे बांधावयास घेतला तेव्हां तो संपूर्ण नवा आणि वेगळा घाटरस्ता व्हावयाचा होता. पण मग पर्यावरणाच्या खटल्यांमध्ये तो अडकला. त्यावर तडजोड व खर्चहि कमी होईल म्हणून वेगळा घाटरस्ता न बनतां घाटभागापुरती NH4 and Expressway यांची मोट बांधण्यात आली. आता गेल्या काही वर्षांच्या वापरानंतर टोलमार्गाने खर्च वसुली होते हे स्पष्ट झाले आहे. टोल जनतेच्या अंगवळणी पडला आहे. तेव्हां ExpressWay कितीहि खर्च पडला तरी घाटातहि स्वतंत्र मार्गाने न्यावा या साठी हा बोगदा योजलेला दिसतो. संपूर्ण रस्ता बोगद्यातून न नेता काही जमिनीवर, भरावावर वा खांबांवर व काही बोगद्यातून (अगदी प्रथमच्या योजनेप्रमाणे) बनवता आला असता पण मग पर्यावरणाच्या चक्रात पुन्हा अडकावे लागेल म्हणून बोगदा काढून सरळ सिहगड संस्थेपर्यंत जाण्याचा पर्याय स्वीकारलेला दिसतो. प्रकल्प पुरा झाला तर कळबोलीपासून थेट पुणे-सातारा बायपासपर्यंत खराखुरा Expressway होईल आणि NH 4 हि रुंद व संपूर्ण स्वतंत्र होईल. आजच्या परिस्थितीत, घाटात जेथे दोन्ही रस्ते एकत्र येतात त्या भागात कोठे काही अपघात वा दुर्घटना घडली तर दोन्ही रस्ते निरुपयोगी होऊ शकतात व मुंबई-पुणे वाहतूक बंद पडूं शकते तसे होणार नाही. दोन्ही रस्त्यांवर टोल मोजावे लागतीलच पण त्याची आता सवयच झाली आहे!

No comments:

Post a Comment