Thursday, January 8, 2015

भारतातील कालगणना

आपल्या भारतात, इंग्रज किंवा मुस्लिम राजसत्ता येण्याचे आधीपासून शालिवाहन शक आणि विक्रम संवत अशा दोन कालगणना/वर्षगणना चालू आहेत व त्या आजतागायत चालू आहेत. मुस्लिम सत्तेच्या काळात हिजरी सनाचा उपयोग होत असला तरी या वर्षगणना आपले स्थान धरून होत्या. इंग्रजी अमलात मात्र इसवी सनाने सत्तेच्या आश्रयामुळे प्रमुख स्थान पटकावले व या दोन्ही कालगणना धार्मिक व्यवहारापुरत्याच वापरल्या जात होत्या. इसवी सनाच्या जगव्यवहारातील स्थानामुळे इंग्रजी अंमल गेला तरी इसवी सन हीच आता प्रमुख कालगणना आपण वापरतो. सणवारांसाठी या जुन्या कालगणना अजून वापरात आहेत हे खरे पण व्यवहारात तारीख हीच खरी हे सत्य नाकारता येत नाही. जरा विचार केला तर शक, संवत व इसवी सन या तिन्ही गणनांची सुरवात एकमेकांपासून फार दूर नाही. विक्रम संवत सर्वात जुना आहे. मला प्रष्न पडला आहे तो असा कीं विक्रम संवत सुरु होऊन, पहिले, दुसरे, दहावे, बासष्टावे वर्ष अशी गणना सुरू होण्यापूर्वी एखाद्या घटनेचा काळ सांगण्यासाठी काय मार्ग होता? वर्ष हे कालाचे माप निश्चित होऊन अनेक शतके लोटली असणार. मग पहिले, दुसरे अशी गणना सुरू होण्याची समाजाला गरजच भासली नाही? कीं इतर अशी शकगणना पद्धत होती पण ती लुप्त झाली? कां? आणि केव्हा? युधिष्ठिर शक असे एक नाव मी ऐकलेले आहे पण विक्रमापुर्वीच्या घटनेचा 'युधिष्ठिर शक अमुक'मधील असा उल्लेख कोठे ऐकिवात नाही. विक्रमसंवत ही गणना तरी कोणी सुरू केली? त्याला तरी अशा गणनेची आवश्यकता कां भासली? समाजाला अशा गणनेची उपयुक्तता कशी जाणवली? विक्रम संवत व शालिवाहन शक अस्तित्वात असूनहि एकटे शिवाजीमहाराजच असे होऊन गेले कीं 'राज्याभिषेक शक' सुरू करावा अशी प्रबळ प्रेरणा त्याना झाली. मात्र, औरंगजेबाचे परचक्र ३० वर्षांच्या अविरत झगड्यानंतर परतवून लावणार्‍या मराठी सत्तेला ती कालगणना पुन्हा सुरू करून आपल्या कारभारात तिचा वापर अनिवार्य करावा असे वाटले नाही! आता काळ फार पुढे गेला आहे आणि इसवी सनाला आता पर्याय नाही.

No comments:

Post a Comment